– उदयकांत ब्राम्हणे
कोरेगाव भीमा -कृषिप्रधान भारत देशात अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञान दिमतीला आले. त्या जोडीला अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने पारंपरिक पिके इतिहास जमा होता की काय, असे वाटू लागले आहे. कारण रब्बी हंगामात तालुक्यात तेलबियांचे क्षेत्र शून्यावर आले आहे. याशिवाय गहू, हरभरा व कांदे या तीन पिकांपुरताच रब्बी हंगाम उरल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे जलाशयांमध्ये आजही चांगला पाणीसाठा असून, भूगर्भातील पाणी पातळीतही चांगली वाढ झाली आहे. पिकांना वेळच्या वेळी पाणी मिळत असल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमाने वाढली आहेत. शेतात बहरलेली पिके पाहून शेतकरी आनंदात आहेत. उसाशिवाय कोणतेच पिक बघायला मिळत नाही.
ज्या गावात शेतकऱ्यांना कमी शेती आहे, ते शेतकरी भाजीपाला पिकवतात. दुभती जनावरे सांभाळणारे शेतकरी मका, कडवळ, घास पिके घेतात. त्यामुळे ज्वारीसाठी बोटांवर मोजण्याइतकी शेती शिल्लक आहे. बाजारपेठेमध्ये ज्वारीचे बाजारभाव गगनाला भिडल्यामुळे गव्हाच्या किमतींच्या दुप्पट दराने ज्वारी खरेदी करून कशीतरी भाकरीचा आस्वाद घेता येतो.
तेल बियांचे उत्पादन शून्य टक्के
करडई, सूर्यफूल, तीळ यांसारख्या तेल उत्पादक पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शिरूर तालुक्यात सरासरी 1450 हेक्टर क्षेत्रापैकी त्यावर्षीच्या रब्बी हंगामात करडई खाली फक्त 1 हेक्टर क्षेत्र आहे. तर सूर्यफूल व तीळ या पिकाखाली कसलेच क्षेत्र लागवडीखाली नाही. एकूण 0 टक्के क्षेत्र तेलबिया लागवडीखाली आहे. यावरून असे दिसते की, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेलबिया लागवडीकडे पूर्ण पाठ फिरवली आहे. तेल गाळपासाठी प्रसिद्ध असलेले तेलघाणे आता उरलेले नाहीत.
शेतकऱ्यांच्या सरकारकडून अपेक्षा
शासनाच्या विविध योजनांची प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी. नदीचे व कॅनॉलचे पाणी योग्य वेळेत मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे. नवीन विहिरी खोदण्यासाठी व जुन्या विहिरींची दुरुस्ती प्रोत्साहन, वीज वेळेत उपलब्ध व्हावी. रात्री अपरात्री वीज देण्यापेक्षा दिवसातील ठराविक वेळी शेतीसाठी वीज पुरवठा व्हावा. वीज डी. पी, तारा, फ्यूज, वीजजोड यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी व आवश्यक आहे तेथे नवीन जोडणी लवकरात लवकर व्हावी. जमिनीचा सामू तपासून शेतीचे आरोग्यकार्ड बनवण्यात यावे. त्यानुसार शेतकऱ्यांना शास्त्रीय माहिती, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व प्रभावी वापर.
शासनाच्या पाणी मोटार, पाईप व शेती अवजारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाटप. सुधारित व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खते, औषधे यांचे योग्य मार्गदर्शन व माहिती मिळावी. बोगस बी बियाणे, खते, औषधे विकणाऱ्या व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी. सिंचन सोयी सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात व शेतीमध्ये बाजार पेठेचा अंदाज घेत शेतकऱ्यांना फायदेशीर अशा पिकांचे उत्कृष्ट वाण उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना चांगला बाजार भाव मिळावा, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
ज्वारीची भाकरी महागली
जिल्ह्याच्या पूर्व भागात ज्वारीचे पीक मागील काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जात होते; मात्र काही वर्षांपासून तालुक्यात फळबागांसह उसाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे तालुक्यातून ज्वारीचे पीक हद्दपार होऊ लागले आहे. ज्वारीचे पिक तालुक्यातून हद्दपार होत असल्यामुळे, भल्याभल्यांच्या जिभेला पाणी सुटणाऱ्या गावरान हुरड्याची चव नव्या पिढीला चाखता येत नाही. ज्वारीचे पीक कमी झाल्यामुळे, गरीबाची भाकरी श्रीमंताच्या ताटात गेली आहे.
100 टक्के लागवडीखालील पीक क्षेत्र
शिरूर तालुक्यातील नगदी पिकांखालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच हे क्षेत्र सरासरी क्षेत्राच्या अपेक्षेपेक्षा 100 टक्के लागवडीखाली आले आहे. यामध्ये बटाटा, मसाला (लसूण व हळद) व चारा पिके 100 टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. या पिकांना बऱ्यापैकी चांगला भाव मिळत असल्याने शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होते त्यामुळे शेतकऱ्यांचा निवडक पिकाच्या लागवडीसाठी कल दिसत आहे.
नगदी पिकांकडे कल
टोमॅटो, बटाटा, कांदा व चारा पिके यांच्याही बाबतीत पुणे, शिरूर, पिंपळे जगताप, चाकण, रांजणगाव, कारेगाव, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वाघोली, चंदन नगर, विमान नगर यासारख्या मोठ्या बाजाराची गावे व बाजारपेठ जवळच उपलब्ध असल्याने नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. या बाजार पेठा व मोठी नागरिवस्ती असल्यामुळे बटाटा, टोमॅटो, कांदा व दुधाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा मोठ्या प्रमानात होत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही पिके समृद्धीचा शेतमळा फुलवण्यासाठी उपयुक्त आहे.