रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध : अभियंता गोरे
निमोणे – शिरूर तालुक्याच्या पूर्वभागात सलग चार दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मोटेवाडी, चव्हाणवाडी गावातील शेतीला वरदान ठरलेला मोटेवाडी पाझर तलाव तुडुंब भरला आहे. तसेच सांडव्याद्वारे पाणी वाहू लागले असल्याने येथील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याची माहिती चासकमानचे शाखा अभियंता राजेंद्र गोरे यांनी दिली.
शिरुर तालुक्यात खरीप हंगामात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत होती. यावेळी मोटेवाडी परीसरातील शेतकऱ्यांनी आमदार ऍड. अशोक पवार यांची भेट घेत या तलावात पाणी सोडण्याची विनंती केली.
त्यानंतर आमदारांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने या तलावात ऑगस्ट महिन्यात पाणी सोडण्यात येऊन पाझर तलाव 100 टक्के भरुन घेण्यात आला.
त्यानंतर पाऊस नसल्याने तलावातील पाण्याची पातळी थोड्या प्रमाणात घटली होती. परंतु सलग चार दिवस मुसळधार पाऊस झाल्याने तलावाच्या सांडव्यातुन पाणी वाहू लागले आहे.
शिरूर तालुक्यातील संपूर्ण पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरुन घेण्याच्या चासकमानच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. तालुक्यातील सर्व छोटे-मोठे पाझर तलाव सध्या 100 टक्के भरले आहेत. सध्या शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सध्यातरी पाणीप्रश्न मिटला असला तरीही शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळून ठिबक सिंचन, तुषार सिंचन या पद्धतीचा वापर करुन पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे.
– ऍड. अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली