केंदूर/नारायणगाव -शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कार्यालयासमोर शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने कांदा निर्यातबंदी या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत ‘राख रांगोळी’ आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यातील खासदारांच्या घराबाहेर आंदोलन केरण्यात येत आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शेलार, संघटनेच्या माहिती तंत्रज्ञान आघाडीचे पंकज गायकवाड, योगेश गायकवाड, बाबा पडवळ, सुजित टाव्हरे, निखील शेवकरी, गणेश कोरेगावकर आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या निर्यातबंदी विरोधात घोषणाबाजी करून केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.
खासदार डॉ. अमोल कोल्हे दिल्ली येथे अधिवेशनात व्यस्त असल्याने त्यांच्या प्रतिनिधीमार्फत निवेदन स्वीकारण्यात आले. आंदोलकांनी खासदार डॉ. कोल्हे यांना शेतकरी हिताची भूमिका घेऊन संसदेत याबाबत आवाज उठवण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचा हा कांदा निर्यातबंदी निर्णय कसा आत्मघातकी आहे, याचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे.
या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना दिली नसतानाही आंदोलकांच्या दुप्पट संख्येने पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनाचे परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
खासदारांनी आमच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून ते स्वतः शेतकरी हिताच्या आणि संघटनेच्या कांदा आयात आणि निर्यातबंदी विरोधी भूमिकेशी सहमत असल्याचे सांगितले व त्यांनी संबंधित मंत्र्यांसोबत केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती आम्हाला दिली.
– पंकज गायकवाड, माहिती तंत्रज्ञान आघाडी शेतकरी संघटना