बारामती – बारामती नगरपालिकेचा कारभार गेले काही महिने मुख्याधिकाऱ्यांविना सुरू आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडचणी होत आहेत. आणि जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने मुख्याधिकारी देता का मुख्याधिकारी, अशीघोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.
करोना संसर्गात नगरपालिकेत मुख्याधिकारी नसल्याने कोविड नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना आखताना अडचण आहे. बारामती तालुक्यातील नव्याने आढळणाऱ्या करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. तरी देखील मुख्याधिकारी नसणे ही लाजिरवाणी बाब आहे. उपमुख्याधिकारी कसलीही जबाबदारी न घेता नागरिकांना प्रांत साहेबांना भेटा, असा सल्ला देतात.
अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कोणाचा वचक नसल्याने ते पण काम टाळत आहेत. मुख्याधिकारी नसल्याचे कारण पुढे करीत प्रत्येक काम टाळले जात आहे. मुख्याधिकारी नियुक्त होण्यास विलंब का लागतो, असा देखील प्रश्न लोकांना पडला आहे. यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, बारामती तालुकाध्यक्ष निलेश वाबळे,
स्वप्नील मोरे, प्रवीण धनराळे, अमोल गालिंदे, भार्गव पाटसकर उपस्थित होते.