नीरा – पुणे आणि सातारा जिल्ह्याची सिमा असलेल्या नीरा नदीच्या पुलाचा काठड्यात अडकून अपघात झाला आहे. भरधाव ट्रक कठड्यावरुन पदपथावर आला. पण सुदैवाने ट्रक नदीत कोसळला नाही. यामुळे पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील वाहन चालकांचा व वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या पुलावर ट्रकला अपघात झाला. रविवारी (दि.28) दुपारी साडेबाराच्या सुमारास लोणंद (जिल्हा सातारा) बाजूकडून मालवाहतूक करणारा ट्रक (एमएच 12 एचडी 0191) नीरा शहराकडे चालला होता. अचानक महिला दुचाकीस्वाराने कट मारल्याने ट्रकचालकाने स्टेअरींग डाव्या बाजुला ओढले या दरम्यान ट्रकचे पुढील बाजूचे डावेचाक रस्त्याचे कमी उंचीचे कठड्यावरून पदपथावर गेले.
ट्रकचे डावी बाजू पुलाच्या मोठ्या कठड्याला टेकणार तोच चालकानेने ब्रेक मारल्याने अनर्थ टळला. अन्यथा ट्रक नदीत कोसळला असता. नीरा, पाडेगाव, निंबूत, वाघळवाडी, मळशी येथील युवकांनी ट्रकचालकाला आधार देत, शर्तीचे प्रयत्न करत कठड्यावरुन ट्रक पुन्हा रसत्यावर आणला. यादरम्यान सुमारे दीडतास वाहतूक कोंडी झाली होती. पालखी मार्गावर नीरा बस स्थानकापर्यंत तर पाडेगाव ऊस संशोधन केंद्रापर्यंत व नगर मार्गावर बुवासाहेब चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक युवकांनीच या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना वाट काढून देण्याचे प्रयत्न केले.
2012मधील आठवणी ताज्या
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 20 जून 2012 रोजी वाल्हे मुक्कामी असताना पहाटेच्या वेळी वारकरी व त्यांचे साहित्य घेऊन निघालेला ट्रक याच ठिकाणी अशाच पद्धतीने नीरा नदीत कोसळला होता. त्यावेळी नऊ वारकऱ्यांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होते. पालखी सोहळ्याआधी प्रशासनाकडून विविध विभागाचे अधिकारी, पालखी सोहळा प्रमुख व मानकरी दौरे करत रस्ता सुरक्षितेची पाहणी करत असतात; मात्र धोकेदायक ठिकाणी काहीच उपाययोजना करताना दिसून येत नाहीत.