दुचाकीवरून चारधाम यात्रा पूर्ण : पाच हजार किलोमीटर भ्रमंती
सुपे – उत्तर भारतातील महादेवाचे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ येथील मंदिरांना भेट देऊन दर्शन घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते, अशाच ध्येयवेडा तरुणाने नकारात्मक विचार न करता फक्त ध्येय -स्वप्नपूर्तीसाठी उत्तर भारतात देवदर्शन केले आहे. मौजे सुपे येथून विलास वाघचौरे ऊर्फ भीमा यांनी दुचाकीवरून प्रवास करीत 5143 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.
वाघचौरे यांनी 4 दिवसांपूर्वी एकूण 5143 किलोमीटरचा प्रवास दुचाकीवर यशस्वी पूर्ण केला आहे. जीवघेण्या स्पर्धेत पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील तरूणाई प्रयत्न करीत असते. त्यातूनही स्वतःच्या काही इच्छा असताना त्या पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल का नाही याची खात्री नाही. परंतु सध्याच्या दिखाव्याच्या दुनियेत समाधानाच्या तत्त्वावर जीवनशैली जगणारी खूप कमी लोक आहेत, अशाचपैकी विलास वाघचौरे ऊर्फ भीमा आहेत.
दुचाकीवर चार धाम यात्रा पूर्ण करून सुखरूप घरी परतले आहेत. मिळेल त्या ठिकाणी विसावा घेत हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. उज्जैन, ऋषिकेश, हरिद्वार, नीलकंठ, अजमेर, पुष्कर, शिर्डी येथे दर्शन घेतले. प्रवासातून परतल्यावर विविध गावातील सरपंच, उपसरपंच, युवा कार्यकर्त्यांनी विलास यांचे स्वागत केले. विलास यांच्या स्वागतावेळी आईला आनंदाश्रू अनावर झाले.
विलास वाघचौरे हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर आहेत. निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या माध्यमातून उन्हाळ्यात पक्षांची पाणी आणि चाऱ्याची सोय करणे, सर्पदंश झाल्यानंतर अनेक रुग्णांसाठी लस मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, लहान मुलांसाठी एक मूल एक झाड उपक्रम आदी विविध उपक्रम ते नेहमीच राबवत आहेत. लवकरच ते दुचाकीवरून भारत दर्शनासाठी निघणार आहेत.