बेलसर-ऊरुळीकांचन रस्त्याची व्यथा कायम
वाड्या-वस्त्यांवर जाणारा एकही रस्ता पूर्ण नाही
निखील जगताप
बेलसर- मागील अनेक वर्षांपासून बेलसर-ऊरुळी कांचन रस्त्याची व्यथा कायम आहे. मागील अंदाजे चार वर्षांपासून सुरू असलेल्या या रस्त्याकडे प्रशासना लोकप्रतिनिधींचे आहे. प्रत्येक वेळी आंदोलनाचा इशारा दिल्यावरच प्रशासन आणि संबंधित ठेकेदार काम सुरू करतात असा पायंडा रस्त्याच्या बाबतीत पडला असल्याने “प्रशासन सुस्त, ठेकादार मस्त’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
अनेक दिवसांपासून रखडलेले काम काम सुरू होताच महावितरणाच्या खांबांचा आलेला अडथळा दूर होताच, आता नवीन प्रश्न नागरिकांच्या समोर निर्माण झाला आहे. रस्ता आता चांगला झाला असल्याने वाहनांचा वेग हा अति असतो, त्यामुळे वाड्या वस्त्यांमधून आणि गावांमधून रस्त्यावरती येणारे किंवा जाणारे प्रवासी हे भयभीत होऊन गाडी चालवत आहेत. या रस्त्यांवर कुठेच पूर्ण प्रकारे गावामध्ये जाणारा किंवा वाड्या-वस्त्यांवर जाणारा सेवा रस्ता झालेला नाही. त्यामुळे या रस्त्यांवर अपघातांची मालिका सुरू होण्याची भेती व्यक्त होत आहे.
एकीकडे कौतुक; मात्र वस्तुस्थिती भयानक
एक बाजू अत्यंत चांगल्या आणि गुणवत्तापूर्ण कामाने पूर्ण झाली असल्याने एकीकडे संबंधित खात्याचे आणि काम करणाऱ्या ठेकेदाराचे कौतुक होत आहे; परंतु दुसऱ्या बाजूचे काम घाईने आणि काही ठिकाणी एका दिवसात डांबरीकरण आणि मुरमीकरण पूर्ण केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे गुणवत्तेबद्दल नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. तर गुणवत्ता तपासणी करावी याबद्दलही नागरिक आपापसात चर्चा करीत आहेत.यामुळे नक्की पाणी कुठे मूरते आहे याबद्दल चर्चा रंगत आहे.
बेलसर-उरळीकांचन रस्त्यावर अद्याप ठीक ठिकाणी गावात किंवा वाड्या-वस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यांची (सेवा रस्ता) व्यवस्था केली गेली नाही. पावसामुळे वाहने घसरून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. लवकरात लवकर सर्व रस्ते पूर्ण करून द्या.
-कैलास जगताप, सरचिटणीस भाजपा पुरंदर