केंदूर- पाबळ जिल्हा परिषद गटात चर्चा : अस्तित्वाची भीती
पाबळ – काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तूर्त स्थगित झाल्या आहेत. दरम्यान, सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या शिरूर तालुक्यातील केंदूर- पाबळ जिल्हा परिषद गटाचे नाव पूर्ववत कान्हूर- करंदी न होता केंदूर- पाबळ हेच राहावे, यासाठी कार्यकर्ते सरसावले आहेत.
काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या गट व गण रचनेत पाबळ- केंदूर जिल्हा परिषद गटाचे नाव बदलून कान्हूर- करंदी गट असे करण्यात आले. त्यावेळी पाबळ व केंदूर गावातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने ही चर्चा मागे पडली होती. मात्र, यात राजकीय स्थानिक नेते गप्प का, अशी चर्चा होती. तरीही दबक्या आवाजात या चर्चेचा सूर होता.
यामागे गेल्य 50 वर्षांहून अधिक काळ गटामुळे चर्चेत असणाऱ्या या गावांचे नाव बदलले गेल्याने अस्तित्व बाजूला सारले जाणार असल्याने उघड नाराजी व्यक्त होत नसली तरी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हा बदल कसा झाला, याचीच कोंडी फुटली. ही बाबच कोणत्याही ज्येष्ठ, कनिष्ठ कार्यकर्त्याला विचारून झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने नाव तेच राहावे, यासाठी कार्यकर्त्यांकडून सक्रिय राहण्याची बाब पुढे आली आहे.
विशेष बाब म्हणजे मतदानाच्या संख्येत आघाडीवर तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सतत अनुकूल भूमिका घेणारी ही गावे आहेत. दोन्ही गावांतून अनेक दिग्गजांची निवड जिल्हा परिषदेवर झाली आहे. उमेदवारीच्या भावी अपेक्षेमुळे सर्वच स्थानिक नेते चर्चेला सार्वजनिकरित्या पाठ दाखवत होते, ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यांच्या भूमिकेबाबत सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. त्याचवेळी पाबळ येथील दोन कार्यकर्त्यांनी हरकती नोंदवल्याची माहिती पुढे येत असून स्पष्ट भूमिका घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच
केले आहे.
पदाधिकारी पाठपुरावा करणार
पाबळ येथील ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश कोल्हे व शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव योगेश चौधरी यांनी त्याचवेळी लेखी हरकत नोंदवल्याची बाब सांगितली आहे. माजी सदस्य कुमार चौधरी यांनी गटाचे नाव पाबळ- केंदूरच राहीन यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याची माहिती दिली आहे.