राजगुरूनगर येथील पाणी परिषदेत एकमुखी निर्णय
राजगुरूनगर – खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी कळमोडी धरणाचे पाणी मिळालेच पाहिजे. अनेक वर्षे कळमोडी उपसा जलसिंचन योजना प्रलंबित आहे. कळमोडीधरणाचे पाणी खेडच्या पूर्व भागासाठी व सातगाव पठारासाठी मिळण्यासाठी आगामी काळात स्थानिक ग्रामस्थांसह आंदोलन उभे करू, असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
राजगुरूनगर येथे कळमोडी पाणीपरिषद कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी आढळराव पाटील यांनी हा इशारा दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, बाबाजी काळे, देवीदास दरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, खेड भाजप अध्यक्ष शांताराम भोसले, डॉ. ताराचंद कराळे, खेड कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अशोक टाव्हरे, राजु खंडीझोड, दिलीप चौधरी, सुभाष गोरडे, कनेरसरच्या सरपंच सुनिता केदारी, गोसासीचे सरपंच संतोष गोरडे, केंदुरचे सरपंच सुनील थिटे, विजयसिंह शिंदे,भरत साकोरे, दिलीप माशेरे, दत्ता लोखंडे,रामदास दौंडकर, राजेश बिडकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले की, तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे पाठपुरावा केला, बैठका घेतल्या, सर्वेक्षण केले; परंतु तांत्रिक बाबींची पूर्तता न करता गावे वगळली. या बैठकीला संबंधित मंत्री व लोकप्रतिनिधी पाण्याविषयी आस्था नसल्याने अनुपस्थित आहे, असे त्यांनी नमूद केले.