केंदूर -शिरूर तालुक्यात चार आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दोन चारा छावण्यांना सरकारने मंजुरी दिली आहे. केंदूर आणि कान्हूर मेसाई (ता. शिरूर) या दोन गावांमध्ये छावण्या असणार आहे, अशी माहिती शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली.
दुष्काळाची तीव्रता गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जाणवत असल्याने केंदूर परिसरात पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे विकली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून केंदूरच्या शेतकऱ्यांनी चारा छावणीची आणि टॅंकरची मागणी केली होती. टॅंकरने मिळणाऱ्या पाण्यातून उर्वरित जनावरांची तहान भागात नव्हती, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चारा छावणीला मंजुरी दिली आहे. छावणीमध्ये 3 हजार जनावरे सहभागी करता येणार आहेत.