न्हावरे (प्रतिनिधी) :- न्हावरे (ता.शिरुर) येथील परिसरात संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आयपीसी कलम- १८८ नुसार न्हावरे पोलिसांनी ३० व्यक्तींवर कारवाई केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केली होती. मात्र, संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे न्हावरे परिसरात विनाकारण फिरणाऱ्या ३० जणांवर पोलिसांनी संचारबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे.
प्रामुख्याने दुचाकीवर फिरणाऱ्यांकडून त्यांच्या दुचाक्या जप्त केल्या आहेत. तर काही दुचाकीस्वारांकडून दंड आकारण्यात आला आहे. संचारबंदीचे उल्लंघन केलेल्यांमध्ये विनाकारण भटकणारे युवक व दारूच्या शोधत फिरणारे तळीराम यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे येथून पुढे विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच एका पेक्षा जास्त जण दुचाकीवर आढळून आल्यास किंवा गाडीवर मास्कचा वापर करत नसल्यास सक्तीने कारवाई करण्यात येणार आहे. असे न्हावरे दुरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे यांनी बोलताना सांगितले.