एटीएम झाले प्रदर्शनाची वस्तू, रक्कम नसल्याने असतात बंद
वाघळवाडी – सलग सुट्ट्यामुळे सोमेश्वरनगर परिसरात खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागाला. याला बॅंकेतील अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप खातेदारांनी केला आहे.
सोमेश्वरनगर हा परिसर बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील मुख्य केंद्र आहे. येथे सहकारी साखर कारखाना, शैक्षणिक संकुले आहेत. सोमेश्वर कारखान्याच्या समोर राष्ट्रीयकृत बॅंक आहे, येथे हजारो लोकांची खाती आहेत. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, साखर कामगार, ज्येष्ठ महिला, बचत गट, स्थानिक पतसंस्था, व्यापारी, व्यावसायिक वर्ग आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचे खाते या राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये आहे.
सलगच्या सुट्ट्या असल्यामुळे बडोदा बॅंकेमध्ये शुक्रवारी (दि. 16) खातेदारांची गर्दी पाहावयास मिळाली. पण राष्ट्रीयकृत बॅंकेतील कॅशिअर अधिकारी सलग सुट्ट्यांमुळे रजेवर गेले होते. त्यामुळे बॅंकेमध्ये रोख रक्कम देवाण घेवाणीचे व्यवहार करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मात्र बदली अधिकारी नसल्यामुळे व तांत्रिक बिघाड यामुळे ताटकळत रांगेत उभे राहावे लागले. यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थिनी यांचे हाल झाले.
याविषयी विचारणा केली असता, संबंधित बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरते बदली अधिकारी अजूनपर्यंत आले नाहीत. ते बारामती येथून निघाले आहेत, ते आल्यानंतर रोखीचे देवाण घेवाणीचे व्यवहार सुरू होतील. सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत संबंधित अधिकारी येईपर्यंत ग्राहकांना रांगेमध्ये उभे राहून त्यांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली. दुपारी 12 नंतर अधिकारी बॅंकेमध्ये आले व नंतर सर्व व्यवहार सुरू झाले.
तोपर्यंत मात्र ग्राहकांची गर्दी बॅंकेमध्ये पाहावयास मिळाली. तसेच या बॅंकेचे शेजारी असलेले एटीएम व कॅश डिपॉझिटर मशीनही सकाळपासून बंद होते. त्याचबरोबर सहकारी बॅंकेचेही एटीएम बंद होते. वाणेवाडीतील दोन बॅंक यांचे एटीएम बंद होते. कुठे कॅश उपलब्ध नाही, तर कुठे तांत्रिक बिघाड, कुठे विद्युत पुरवठा खंडित झाले. या कारणांमुळे सोमेश्वरनगर परिसरातील सर्व एटीएम बंद होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सलग सुट्टयांचा बॅंकांचा बेफिक्री कारभार यामुळे दैनंदिन व्यवहारावर ती फार मोठा परिणाम पाहावयास मिळाला.
- असं कुठे असतं का ? मी सकाळी माझ्या शेतमजुरांचे ठराविक रक्कम देण्यासाठी माझ्या खात्यावरून पैसे काढण्यासाठी आले असता सकाळी मी बॅंकपुस्तक व चलन बॅंकेत जमा केले होते. पण माझा सकाळी पहिला नंबर असून 12वाजेपर्यंत माझा पैसे घेण्यासाठी नंबरच आला नाही. असं कुठे असतं का? या डिजिटल युगात.
-बाजीराव शिंदे, माजी सरपंच करंजे गाव