पुणे- “शहरामध्ये भाजपने जे काम केले आहे, त्यावर पुणेकर खुश आहेत. त्यामुळे प्रभाग रचना कशीही झाली, तरी गेल्या साडेचार वर्षांत आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार,’ असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी सोमवारी व्यक्त केला.
मुळीक यांनी सोमवारी “प्रभात’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. भाजपचे नगरसेवक राजेश येनपुरे याप्रसंगी उपस्थित होते. मुळीक म्हणाले, “पुण्यातील नागरिक विकासाबाबत अधिक जागरूक आहेत. त्यामुळे आम्ही प्रभाग रचनेचा कधीच विचार केला नाही.
गेल्या साडेचार वर्षांत भाजपने शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे केली. या उलट राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुण्यासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे विरोधकांच्या भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणाला पुणेकर कंटाळले आहेत.
तर करोना काळातही भाजपने केलेले काम पुणेकरांनी पाहिले असून त्याच कौतुकही केलेले आहे. यामुळे शहरात तसेच जनतेमध्ये भाजपबाबत सकारात्मक वातावरण आहे. ते पाहता, महापालिकेत भाजपची सत्ता येईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.’
पुढे बोलताना मुळीक म्हणाले, “गेल्या साडेचार वर्षांत केवळ निवडणुका म्हणून आम्ही शहराकडे पाहिले नाही; तर विकास हाच आमचा अजेंडा घेऊन आम्ही काम करत राहिलो. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणुका लढवणार आहोत.
भाजपने शहरासाठी मागील साडेचार वर्षांत समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले. मेट्रो हे पुणेकरांचे स्वप्न होते. ते काम प्रत्यक्षात भाजपने सुरू केले. मेट्रोचा वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गाचे शेवटच्या टप्प्यात असून लवकरच ती धावेल. शहराच्या आसपासच्या भागातही मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे.
भामा-आसखेड प्रकल्प, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय, पीएमपीचे सक्षमीकरण, वाहतूक कोंडी फोडण्यासठी उड्डाणपूल, रखडलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करणे, नदीसुधार योजना असे प्रकल्प मार्गी लावले आहेत. त्यामुळे जनतेलाही विकास हवा असून तो भाजपने प्रत्यक्षात उतरविला आहे,’ असेही मुळीक यांनी केला आहे.
भाजपमध्ये कोणीही नाराज नाही
“भाजपचे काही नगरसेवक नाराज असून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वी पसरल्या होत्या. मात्र, त्यात तथ्य नाही. अशा प्रकारच्या बातम्या विरोधकांकडून पसरवल्या जात होत्या. कोणीही पक्ष सोडणार नाही. या उलट विरोधी पक्षांतील नगरसेवक आणि पदाधिकारी माझ्या संपर्कात आहेत.
जसजशी निवडणूक जवळ येईल, तसे त्यांना पक्षात घेतले जाणार आहे, असेही जगदीश मुळीक यांनी सांगितले. तसेच, 2017 च्या मतांच्या टक्क्यांचा आधार घेत, राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना-कॉंग्रेस एकत्र आले तर भाजपला फटका बसेल असे सांगण्यात येत आहे.
मात्र, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मताधिक्य पाहता अशा बातम्यांना काहीच अर्थ राहत नाही,’ असे सांगत हा युक्तिवाद शहराध्यक्ष मुळीक यांनी खोडून काढला.