पुणे -करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आल्या. करोनामुळे अनेक अडचणींचा सामना करीत एमपीएससी पूर्व परीक्षा द्यावी लागली आहे. या सर्व घटकांचा विचार करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेस पात्र करण्यासाठी उत्तीर्णतेच्या प्रमाणात वाढ करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांतून होत आहे.
पूर्व परीक्षा ही चाचणी परीक्षा असूनही उत्तीर्णतेचे प्रमाण 1ः14 आहे. तर ती आता 1ः25 करावी, अशी उमेदवारांची प्रमुख मागणी आहे. यापूर्वी आयोगाने उत्तीर्णतेचे प्रमाण वाढविले आहे. त्याप्रमाणे नुकत्याच झालेल्या पूर्व परीक्षेतही हे प्रमाण वाढविले तर अनेक उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी संधी मिळेल.
काही उमेदवार गेल्या चार-पाच वर्षापासून अभ्यासाची तयारी करीत आहेत. करोनामुळे त्यांचे एक वर्ष वाया देखिल गेले आहे. राज्यतील उमेदवारांना आर्थिक अडचणी, वय वाढणे, मानसिक त्रास तसेच बऱ्याच उमेदवारांना परीक्षेची शेवटची संधी या कारणाने पुन्हा परीक्षा देता येणार नाही. या सर्व गोष्टीला उमेदवारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आयोगाने याबाबत सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.तसेच मागच्या दोन वर्षांत परीक्षा झालेली नसल्याने ज्यांचे वय जास्त आहे, अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेचे विद्यार्थी प्रमाण वाढवल्याने संधी मिळेल, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
पूर्व परीक्षा ही फक्त चाळणी परीक्षा आहे. त्याचे गुण कुठेच ग्राह्य धरले जात नाही. तसेच केंद्रीय स्तरावरील असणाऱ्या काही परीक्षा यामध्ये देखील उत्तीणतेचे प्रमाण 1ः25 हे प्रमाण वापरले जाते. आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व सेवा या परीक्षेत हेच उत्तीर्णतेचे प्रमाण अपेक्षित आहे. आयोगाने सर्व घटकांचा विचार करता पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्णतेचे प्रमाण वाढवावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईटस्चे महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी केली आहे.