हॉटेल सुरू होणार असल्याने मागणी वाढली
पुणे – पावसाने मागील आठवड्यात काहीकाळ उघडीप दिल्याने फळभाज्यांची आवक मार्केट यार्डात वाढली आहे. त्यातच हॉटेल, खानावळी सुरू होणार असल्याने फळभाज्यांना मागणी वाढली आहे.
हिरवी मिरची, सिमला मिरची, कारली, दोडका, फ्लॉवर, कोबी, वांगी, लसुण आणि भुईमुगाच्या भावात वाढ झाली आहे.
तर, मागणीच्या तुलनेत आवक वाढल्यामुळे टोमॅटो, शेवगा, भेंडी आणि दुधी भोपळाच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. हंगाम सुरू झाल्याने नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. स्थानिक मटारचा हंगाम संपला असून, मटारची सध्या परराज्यातून आवक होत आहे. त्यामुळे मटारचे भाव तेजीत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी येथील बाजारात 80 ते 85 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये इंदौर येथून 6 ते 7 टेम्पो गाजर, कर्नाटक, गुजरात येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडु आणि गुजरात येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडु येथून शेवगा 3 टेम्पो, सिमला येथून 1 ट्रक मटार तर आग्रा, इंदौर स्थानिक मिळून 45 ट्रक बटाटा, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून 6 ते 7 ट्रक आवक लसणाची झाली.
स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 650 गोणी, कोबी सुमारे 3 ते 4 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, सिमला मिरची 6 ते 7 टेम्पो, टोमॅटो 10, भुईमूग शेंगा सुमारे 150 गोणी, घेवडा 2 ते 3 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांद्यामध्ये जुना 50 ते 60 ट्रक, तर नवीन कांद्याची चारशे गोणी आवक झाली.