पुणे – पुणे शहर आणि परिसरात पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे काम आतापर्यंत ६० टक्के पूर्ण झाले आहे. रविवार सकाळपर्यंत उर्वरित पंचनाम्याचे काम पूर्ण करून शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
पंचनामे करण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरात २ हजार ५००, पुणे शहरात २ हजार २०० आणि हवेली तालुक्यात ९०० पंचनामे असे एकूण ५ हजार ६०० पंचनामे पूर्ण करण्यात आले. त्याचप्रमाणे पुरामुळे काही नागरिकांचे आधारकार्ड, विविध प्रकारचे दाखले आदी कागदपत्रे खराब झाली किंवा पुराच्या पाण्यात वाहून गेली. अशा नागरिकांना नवीन कागदपत्रे तयार करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे १२ ठिकाणी मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
डॉ. राजेंद्र प्रसाद शाळा बोपोडी, कॅन्टोन्मेंट कार्यालय खडकी, महात्मा ज्योतिबा फुले शाळा ताडीवाला रोड, परुळेकर शाळा येरवडा, बुद्ध विहार समाज मंदिर मंगळवार पेठ, बारणे शाळा मंगळवार पेठ, कलमाडी शाळा मंगळवार पेठ, अनुसयाबाई खिल्लारे शाळा एरंडवणे, आंबेडकर शाळा पाटील इस्टेट, तपोधाम सोसायटी वारजे, एकतानगर वडगाव बुद्रुक, इंदिरा नगर उत्तम नगर, वडगाव शेरी, याठिकाणी नागरिकांना नवीन कागदपत्रे देण्यासाठी आवश्यक मदत करण्यात येईल आणि जागेवरच आवश्यक दाखले देण्यात येतील.
पर्यटनस्थळांवर पुढील आदेशापर्यंत बंदी
जिल्ह्यातील काही भागात अजूनही पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसात यलो अॅलर्ट दिल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर बंदी राहील, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. नागरिकांनी धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहनही प्रशासनने केले आहे.
“नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यांना दैंनंदिन कामात अडचण होऊ नये यासाठी तात्काळ आवश्यक दाखले देण्यासाठी स्वतंत्र मदत केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. पूरग्रस्तांना सर्व सुविधा देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.” – डॉ.सुहास दिवसे, जिल्हाधिकारी.