पुणे – प्रशासनाने शहरात दोन दिवस टाळेबंदी लागू केली असून दोन दिवस शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. कारवाई पोलिसांचे धोरण नसून कारवाईची वेळ आणू नका, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, शहरात शनिवारी आणि रविवारी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला विक्रीची दुकाने बंद राहणार आहे. दूध विक्रीस सकाळी अकरा वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. औषध विक्री, प्रयोगशाळा, रूग्णालयांना निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
गेल्या शनिवारी आणि रविवारी नागरिकांनी टाळेबंदीस उस्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्व व्यवहार बंद आहेत. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. कारवाई करणे हे पोलिसांचे धोरण नाही. मात्र, करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी संपर्क टाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी कारवाईची वेळ आणू नये, असे डॉ. शिसवे यांनी सांगितले.
यापूर्वी शहरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीस नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता. गणेशोत्सव तसेच नववर्ष स्वागतानिमित्त शहरात लागू करण्यात आलेले निर्बंधांचे नागरिकांनी पालन केले. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. नाकाबंदीत ओळखपत्राची मागणी करण्यात येईल. ओळखपत्र किंवा योग्य कारण नसल्यास पोलिसांकडून वाहन जप्तीची कारवाई, दंडात्मक कारवाई तसेच खटले दाखल करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.