पुणे – एका तरुणीने डॉक्टरच्या हाताखाली काम करत मेहनतीने दोन मोबाईल विकत घेतले होते. मात्र हे दोन्ही मोबाईल एके दिवशी चोरीला गेले. मोबाईल चोरीला गेल्याने तरुणीला अनेकदा रडू कोसळले होते. मोबाईल मिळेल या आशेने तीने अनेकदा पोलिस ठाण्यात फेऱ्याही मारल्या होत्या. मात्र मोबाईल मिळेल अशी आशा दिसत नव्हती.
तिची अवस्था पाहून पोलिसांनी समर्थ तीला मोबाईल परत मिळवून देण्याचा विडा उचलला. तीचे दोन्ही मोबाईल राजस्थानमधील वेगवेगळ्या शहरांत कार्यरत असलेले दिसले. यानंतर समर्थ पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा करत तीला दोन्ही मोबाईल मिळवून दिले. मोबाईल परत मिळताच तीला पुन्हा रडू कोसळले, मात्र त्यातील अश्रू हे आनंदाचे होते.
समर्थ पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 13/07/2021 रोजी तक्रारदार नामे प्रियल शहा यांचे दोन मोबाईल रास्ता पेठ येथून गहाळ झाल्या बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे व पोलीस निरीक्षक कदम (गुन्हे) समर्थ पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई मोरे यांनी मोबाईल ट्रेसिंग लावले. त्याचे लोकेशन राजस्थान राज्यातील कोटा व जयपुर असे मिळून आले.
पोलिसांनी राजस्थानमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोबाईल परत मिळविले. हे दोन्ही तक्रारदार यांना महिला पोलीस उपनिरीक्षक कुटे यांच्या हस्ते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताम्हाणे यांच्या समक्ष देण्यात आले. सदरची ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताम्हणे,पोलीस निरीक्षक कदम (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शन खाली तपास पथकातील पोलीस अंमलदार मोरे, पोलीस हवालदार लोणकर, पोलीस हवालदार काळे ,पोलीस नाईक पिंगळे,पोलीस शिपाई चोरमले,निलेश साबळे, सुमित खुट्टे, पेरणे, सूर्यवंशी यांनी केली आहे.
… असे पोहचले मोबाईल राजस्थानला
प्रियल शहा यांचे दोन्ही मोबाईल चोरणाऱ्याने ते पुणे स्टेशनवर जाऊन विकले होते. गावाला जायला पैसे नाहीत म्हणूत हे मोबाईल हजार दोन हजारात राजस्थानला जाणाऱ्या मजूरांना विकण्यात आले होते. त्यांनी राजस्थानला गेल्यावर त्यात सीमकार्ड टाकून ते ऍक्टिव्ह केले. मोबाईल ऍक्टिव्ह झाल्यावर ट्रेसिंगमध्ये कार्यरत असलेला मोबाईलनंतर मिळून आला. हे मोबाईल वापरणाऱ्यांना त्यासंदर्भात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले.
मोबाईल परत न पाठवल्यास तुमच्यावर चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो अशी कल्पना दिली. तरीही मोबाईल वापरणारे ते परत करण्यात टाळाटाळ करत होते. अखेर समर्थ पोलिसांनी कोटा व जयपुर येथील नियंत्रण कक्षास याची माहिती दिली. यानंतर तेथील ओळखीच्या पोलीस कर्मचाऱ्यास मदतीची विनंती केली. या पोलीस कर्मचाऱ्याच्या कार्यक्षेत्रापासून मोबाईल वापरकर्ते 100 आणी 60 किलोमीटर लांब अंतरावर रहाणारे होते. त्यांनी मोबाईल संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यास आणून दिल्यावर त्याने ते समर्थ पोलिसांच्या नावाने कुरिअर केले.