करोना प्रसार रोखण्यासाठी नवीन दाव्याची कागदपत्रे 24 ते 48 तास बाहेर ठेवणार
पुणे(प्रतिनिधी) – न्यायालयात दररोज दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या मोठी आहे. लॉकडऊननंतर न्यायालय दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्या वाढणार आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर नव्यावे दाखल होणाऱ्या खटल्याच्या कागदपत्रापासून संसर्ग होऊ नये, यासाठी शिवाजीनगर आणि कौटुंबिक न्यायालयात विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. नव्याने खटले दाखल झाल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयात 24 ते 36 तास, तर कौटुंबिक न्यायालयात 48 तास ही कागदपत्रे लॉकडाऊन असणार आहेत. त्यानंतर त्यावर पुढीला प्रक्रिया केली जाणार आहे.
लॉकडाउनमुळे दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून न्यायालयाचे कामकाज बंद आहे. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने योग्यती खरबदरी घेऊन 8 जूनपासून न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार न्यायालयाचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे.
शिवाजीनगर न्यायालयाविषयी पुणे बार असोसिएशनचे सचिव अॅड. घनश्याम दराडे म्हणाले, दावा दाखल करून घेण्यासाठी वेगळी उपाययोजना केली जाणार आहे. दावा दाखल केलेली कागदपत्रे 24 ते 36 तास बाजूला ठेवण्यात येणार आहेत. मात्र, ती 72 तासापेक्षा जास्त ठेवता येणार नाही, असेही उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशात म्हटले आहे.
दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे म्हणाल्या, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कौटुंबिक न्यायालयाने एक महत्वपूर्ण उपाययोजना केली आहे. न्यायालयात नव्याने खटला दाखल करण्यासाठी प्रथम न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित खटला दाखल करून घेण्यात येणार आहे. खटला दाखल करण्यासाठी न्यायालयाच्या प्रमुख प्रेवशद्वारावर स्वतंत्र्य कक्ष सुरू करण्यात आले आहे. खटला दाखल करण्यासाठी फक्त एका वकिलालाच प्रवेश देण्यात येणार आहे. खटला दाखल करण्यात आल्यानंतर संबंधित खटल्याची कागदपत्रे वेगळी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढची प्रक्रिया होणार आहे. जर कागदपत्रे अपूर्ण असतील तर संबंधित वकिलाशी संपर्क साधून कळविण्यात येईल.