पुणे –शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या तापमान वाढीचा त्रास माणसांसोबतच प्राण्यांनाही होत आहे. याचाच विचार करून कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 62 प्रजातीच्या 430 पक्षी आणि प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी फॉगर, कुलर, स्प्रिंक्लरची सोय करण्यात आली आहे. तसेच पक्षी आणि प्राण्यांच्या आहारातदेखील बदल केला आहे. त्यात हिरव्या चाऱ्याबरोबरच फळांचा समावेश करण्यात आला आहे. तृणभक्षक प्राण्यांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढवले आहे. तर, हत्ती आणि इतर काही प्राण्यांच्या आहारात पाणीयुक्त फळांचे प्रमाण वाढवले आहे. उन्हाळ्यात प्राण्यांना त्वचेचे आणि डी-हायड्रेशनचा त्रास आणि इतर समस्या जाणवतात. त्यामुळे वैद्यकीय पथकाकडून रोजच्या रोज प्राण्यांची तपासणी केली जात असल्याचे पशू वैद्यकीय अधिकारी सुचित्रा पाटील यांनी सांगितले.
दरवर्षी आम्ही उन्हाळ्यात प्राणी आणि पक्ष्यांची काळजी घेत असतो, पण यावर्षी तापमानात मागच्या काही वर्षांपेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे यावर्षी त्यांची विषेश काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या आहारात थोडे बदल करण्यात आले आहेत. तसेच वैद्यकीय पथकाकडून रोजच्या रोज तपासणी केली जाते. – डॉ. राजकुमार जाधव, संचालक राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज
*प्राण्यांसाठी विशेष काळजी
हत्तीसाठी तलाव
*सांबर-हरिणांसाठी चिखल पॉइंट वैद्यकीय काळजी वैद्यकीय पथकाकडून प्राण्यांना खाद्य आणि पाण्याद्वारे मल्टीविटॅमिन दिले जाते
*प्राण्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी विविध उपाययोजना