पुणे – निवडणुकांच्या काळात घडणाऱ्या कोणत्याही घडामोडींमुळे विचलित न होता कॉंग्रेसचे कार्यकर्ते नेटाने महापालिका निवडणुकांना सामोरे जातील, असा विश्वास माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शहरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि बैठका घेण्यास मोहन जोशी यांनी प्रारंभ केला आहे. निवडणुकाजवळ आल्या की अनेक घडामोडी घडतात. काहीजण संधीसाधूपणाने भूमिका बदलत असतात पण यातून अजिबात विचलित न होता कॉंग्रेस कार्यकर्ते नेटाने निवडणूक लढवतील.
कॉंग्रेस पक्षाची विचारधारा मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे. विविध जातीधर्मांना एकत्र घेऊन सलोख्याने वागणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे महत्त्व पुणेकरांना पटले आहे. मोदी सरकारच्या भूलथापा आणि पोकळ आश्वासनांना जनता कंटाळली आहे. कॉंग्रेस पक्ष हाच योग्य पर्याय असल्याचे लोकांना कळून चुकले आहे, असे जोशी यांनी बैठकांमधून सांगितले.
महापालिका निवडणूक वॉर्ड पद्धतीने होवो अथवा द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने होवो कॉंग्रेस पक्षाची सामोरे जाण्याची जय्यत तयारी आहे, असेही जोशी यांनी स्पष्ट केले. नेहरु योजना, हरित पुणे योजना अशा कामांतून पुण्याच्या विकासात कॉंग्रेसच्या योगदानाची पुणेकरांची जाणीव असल्याचे जोशी म्हणाले.