पुणे – नदी सुधार प्रकल्पात नदीचे पात्र कमी होणार असल्याने उद्या मुठा नदीवरील धरण क्षेत्रात अतीमुसळधार किंवा ढगफुटीसदृश पाऊस झाल्यास त्याचा फटका नदी काठावरील वस्ती आणि आजूबाजूच्या गावांना बसू शकतो. पाटबंधारे विभागाच्या पत्रातच ही शंका व्यक्त करण्यात आली आहे. तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे मांडली.
वारजे येथे एका महापालिकेच्या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी पवार बोलत होते. पालिकेच्या नदीसुधार योजनेचे उद्या (दि. 6) भूमिपूजन होत आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी शहरावरील या संभाव्य संकटाबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, खडकवासला, वरसगाव, पानशेत अशी धरणे पुण्याच्या वरच्या भागात आहेत. अशा परिस्थितीत नदी पात्राची रुंदी कमी झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असे सांगून पानशेत धरण फुटल्यानंतर पुण्याचा पूर्ण चेहरामोहरा बदलून गेला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तर काय होईल? याची झळ गावांना आणि नदीकाठच्या परिसराला बसेल, याची काळजी वाटते, पण उद्या काही झाले तर ते आपल्यालाच निस्तरावी लागणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
…तरी पंतप्रधान उद्घाटनाला येतात
पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक महिन्यापूर्वी मेट्रोची पाहणी केली. यामध्ये मेट्रोचे काम अपूर्ण असल्याचे दिसून आले. अजून काम पूर्ण होणे बाकी आहे. काम झाले नाही तरी पंतप्रधान उद्घाटनाला येतात, असे पवार यांनी यावेळी सांगितले.
ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करू
ओबीसी आरक्षणावर विचारले असता पवार यांनी सांगितले की, काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात काय झाले मला माहीत नाही. कायदा केला असेल, नसेल तरीही ओबीसींच्या हिश्श्याचे आरक्षण देण्यासाठी आम्ही जे जे करता येईल ते करू.