पुणे : शहरातील व्यापारी, व्यापाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनला विरोध केला आहे.
आता पुन्हा लॉकडाऊन जाहिर केल्यास व्यापाराची मोठी हानी होणार असून, ती सहन करणे अवघड आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक बरोबरच मानसिक खच्चीकरण होणार आहे. झालेल्या नुकसानीमुळे शहरातील काही व्यापाऱ्यांनी यापूर्वी आत्महत्याही केलेल्या आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे ई-मेल पाठवून केली असल्याची माहिती अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाने नुकताच 13 जुलैपासून 10 दिवस लॉकडाऊन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महासंघाने ही भूमिका घेतली आहे. 17 मार्चपासून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. अद्याप व्यापार सुरळीत झालेला नाही. व्यापाऱ्यांना नोकरांना पगार द्यावाच लागत आहे. कर्जाचे हप्ते आहेत, दुकान भाडे, घरभाडे, वीज बिल भरावे लागते. तीन महिने कोणतेही उत्पन्न नसताना व्यापाऱ्यांनी हे सहन केले. आता ते शक्य नाही. दुकाने बंद ठेवणे हा करोना संसर्गावर उपाय नाही, असे निवेदनात म्हटले आहे.