पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत विकास आराखडा तयार करण्याची मुदत दोन महिन्यांत समाप्त होत आहे. या कालावधीत विकास आराखडा तयार करण्याचे आव्हान पीएमआरडीएपुढे असणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरावरील ताण कमी व्हावा, तसेच पुणे महानगर क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून पीएमआरडीएची स्थापना 4 वर्षांपूर्वी करण्यात आली. त्यामुळे सुमारे सात हजार चौरस किलोमीटर परिसर आणि सुमारे 800 गावांच्या विकासाची जबाबदारी ही पीएमआरडीएवर आली आहे. जुलै 2017 मध्ये या संपूर्ण हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा पीएमआरडीकडून हाती घेण्यात आला होता. पुढील दोन महिन्यांत त्यांची मुदत संपुष्टात येत आहे. गेल्या वर्षी पीएमआरडीएच्या हद्दीसाठीची बांधकाम नियमावलीस राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली. त्यामुळे पीएमआरडीएकडून प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या हरकती-सूचनांसाठी प्रसिद्ध केला जाईल, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र अद्यापही आराखड्याचे काम पूर्ण झालेले नाही.
जुलै महिन्यात विकास आराखडा तयार करण्याची मुदत संपुष्टात येत आहे. या मुदतीत आराखडा पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यास मुदतवाढ द्यावी लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.