ओढ्यातून काढलेला कचरा बाजुलाच टाकला ः ढिग साचल्याने नागरिक त्रस्त
वानवडी – येथील ओढ्याबाजूला अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढिग साचले आहेत. हा कचरा वेळोवेळी उचलला जात नसल्याने येथून जाताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने येथील कचरा उचलावा, अशी मागणी होत आहे.
वानवडी बाजारकडून- गावठाणात जाताना काही दिवसांपूर्वी ओढ्याची स्वच्छता करण्यात आली. पण, हा कचरा ओढ्याबाजूलाच टाकल्याने तेथे ढिग निर्माण झाले आहेत. यातच पावसामुळे कचऱ्यात साचलेले पाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे दुर्गंधी वाढत आहे. शिवाय यामुळे डासांची उत्पती होत आहे.
कचऱ्यामध्ये खाद्यपदार्थ, ओला-सुका कचरा एकत्रच असल्याने तेथे भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. ही कुत्री वाहन चालकांवर धावून येतात. त्यामुळे भीतीचे वातावारण आहे. पहाटे कामानिमित्त,व्यायामासाठी जाणाऱ्या आणि रात्रपाळीत काम करून परताणाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे.