पुणे – यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी एकूण 5 कोटी 40 लाख प्रतींचा पाठ्यपुस्तके पुरवठा करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी ही सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे यंदाही सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत.
समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रकल्प संचालक कैलास पगारे, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी इंदरसिंग गडाकोटी, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन, वणवे आदि उपस्थित होते.इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. जूनपासून राज्यातील शाळा नियमितपणे सुरू होत आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पाठ्यपुस्तके शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी आजपासून मोफत पाठ्यपुस्तक वितरणाला सुरुवात करण्यात आली. समग्र शिक्षा अभियानाव्यतिरिक्त इयत्ता पहिली ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.