“एएमबीआयएस’ यंत्रणा कार्यान्वित : गुन्ह्यांची उकल तातडीने होण्यास पोलिसांना मदत
पुणे – पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरून केवळ बोटांचे ठसेच नाही तर आता तळवे, चेहरा आणि डोळे स्कॅन करून ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी एएमबीआयएस प्रणाली सुरू असून, ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस घटकांकडून या यंत्रणेचा वापर झाल्यावर गुन्ह्यांची झटपट उकल होऊन दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांनी व्यक्त केला.
“ऑटोमोटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम’ (अचइखड) या संगणकीय प्रणालीचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्चिम) सुरेश मेखला, पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक ए.डी. शिंदे, देशपांडे उपस्थित होते.
पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशावरून आरोपीची ओळख पटवली जायची. मात्र आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे. या प्रणालीत आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताचे ठसे, चेहरा व डोळ्यांची बुबुळे हे डिजिटल स्वरुपात जतन करुन ते अभिलेखाशी जुळविण्याची क्षमता आहे.
प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक पल्लवी बर्गे, रोहिदास कसार, अविनाश सरवीर, रुपाली गायकवाड यासह अधिकारी उपस्थित होते.