पुणे – राज्यात विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना भेडसावणारा कोळशाचा तुटवडा लक्षात घेता बायोमाससारखे जैव इंधन अतिरिक्त पर्याय ठरू शकतो, असे मत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी व्यक्त केले.
बायोमास ऊर्जा म्हणजे काय?
बायोमास ही प्राणी आणि वनस्पती आधारित इंधन आहे. ज्यामध्ये कचरा, लाकडाचे अवषेश आणि मृत जणावरांचा समावेश होतो. याच्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला बायोमास असे म्हणतात. अलिकडील काळात इतर ऊर्जा स्त्रोतांचा तुडवडा आणि वाढते प्रदूषण यावर बायोमास ऊर्जेचा सर्वात उत्तम स्त्रोत म्हणून पुढे येत आहे.
बायोमासचे फायदे
बायोमास हा ऊर्जेचा अक्षय स्त्रोत आहे
याच्या निर्मीतीसाठी कमीत कमी खर्च होतो
कचऱ्याचा वापर करून बायोमास निर्मिती करता येते
बायोमासमुळे हवेचे प्रदूषण टाळता येते
लघुउद्योगांना कमी खर्चात इंधनाचा पर्याय
उपलब्ध होतो
मिशन समर्थ
जैव इंधनाचा वापर आणि पर्यावरणपूरक वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय उर्जा मंत्रालय “मिशन समर्थ’ राबवत आहे. यामध्ये औष्णिक वीज केंद्रात कोळशासोबत किमान पाच टक्के प्रमाणात बायोमास पॅलेट इंधनाचा मिश्रित वापराच्या सूचना आहेत.
विजेची मागणी 27 हजार मेगावॅटवर
राज्यात महानिर्मितीची स्थापित औष्णिक विद्युत क्षमता साडेनऊ हजार मेगावॅट असून, विजेची मागणी 27 हजार मेगावॅटवर गेली आहे. त्याची पूर्तता करताना कोळशाला पर्याय नसला, तरी बायोमास पॅलेट हे अतिरिक्त पर्याय ठरू शकते. पावसाळ्याचा अपवाद वगळता ऑक्टोबर ते जून दरम्यान बायोमास पॅलेटचा वापर करून वीज निर्मिती करता येते. त्यामुळे कोळशाची बचत होईल, तसेच पर्यावरणाला हातभार लागेल.
शेतकऱ्यांच्या पुढाकाराची गरज
शेतीतील कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी मिशन समर्थ हाती घेण्यात आले आहे. राज्यात 52 दशलक्ष मेट्रिक टन बायोमास उपलब्ध आहे. त्यापैकी घरगुती व इतर उपयोग वजा केल्यास 21 दशलक्ष मेट्रिक टन बायोमास वीज निर्मितीसाठी वापरणे शक्य आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या पुढाकाराची गरज आहे. शेतकऱ्यांनी सहकाराच्या माध्यमातून बायोमास संकलित करून त्याचे पॅलेट तयार केल्यास उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल.