पुणे – मुंबई आणि दिल्लीला मागे टाकत पुणे विमानतळानं बाजी मारली आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळ सर्वात फायदा मिळवून देणारे ठरले होते. तर दिल्ली आणि मुंबई विमानतळाच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. पुणे विमानतळाचा कारभार सध्या एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडे आहे.
कोरोनाकाळातही पुणे विमानतळाच्या व्यवसायात बरकत कायम राहिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळाच्या व्यवसायात 16.09 कोटी, जुहू विमानतळ 15.94 कोटी, श्रीनगर विमानतळ 15.94 कोटी, पाटणा विमानतळ 6.44 कोटी आणि कानपूर विमानतळाच्या व्यवसायात 6.07 कोटी रुपयांचा फायदा झाला. श्रीनगर आणि कानपूरच्या विमानतळाचा कारभार सध्या भारतीय हवाई दलाकडे आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या विमानतळांच्या यादीत मुंबई अग्रस्थानी आहे. गेल्या आर्थिक वर्षात मुंबई विमानतळाच्या व्यवसायात 384.81 कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर चेन्नई 253.59 कोटी, त्रिवेंद्रम 100.31 कोटी, अहमदाबाद 94.1 कोटी या विमानतळांचा समावेश आहे.
दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळाच्या व्यवसायात 317.41 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या दोन्ही विमानतळांमध्ये एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचा हिस्सा अवघा 26 टक्के आहे. तर मुंबई विमानतळाची 74 टक्के हिस्सेदारी अदानी समूहाकडे आहे.
गेल्या आर्थिक वर्षात देशातील 138 विमान विमानतळांना साधारण 2883 कोटींचा तोटा झाला. 2019-20 या आर्थिक वर्षात 136 विमानतळांच्या कारभारातील नुकसानीचा आकडा 80 कोटी तर 208-19 या आर्थिक वर्षात हाच आकडा 466 कोटी रुपये होता. ही आकडेवारी पाहता यावेळी तोट्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.