पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने लादलेले निर्बंध हे ठेवीदारांचे हीत डोळ्यांसमोर ठेऊनच टाकलेले आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरुन न जाता संयम बाळगावा, असे आवाहन महाराष्ट्र नागरी सहकारी को-ऑप. बॅंक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केले आहे.
“पुणे शहरातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. खातेदारांना फक्त एक हजार रुपयेच काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. थकीत कर्जाची रक्कम वाढल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या प्रशासक मंडळाने थकीत कर्ज वसुलीचे प्रमाण वाढविले आहे. ही वसुलीची रक्कम वाढली, की बॅंकेच्या व्यवहारात आर्थिक तरलता येऊ शकते. त्यामुळेसुद्धा बॅंकेच्या व्यवहारात सुधारणा होईल,’ असेही अनास्कर यांनी स्पष्ट केले आहे.
आरबीआयच्या निर्देशांनुसार एक लाखापर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण असल्याने वैद्यकीय शैक्षणिक व इतर तातडीच्या गरजा भागविण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगीने गरजूंना एक लाख पर्यतची रक्कमही देऊ शकते. या पार्श्वभूमीवर तातडीने गरज असणाऱ्यांनी पुराव्यांसह बॅंकेकडे अर्ज करावेत, असेही त्यांनी सांगितले आहे