पुणे – बालगंधर्व रंगमंदिराच्या बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करताना कोठेही व्यावसायिक शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल अथवा हॉटेल असे बांधकाम केले जाणार नाही. त्यामुळे या विषयाला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
सुमारे 54 वर्षे जुने असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला पालिका प्रशासनाने गती दिली आहे. त्याचा अंतिम आराखडा पालकमंत्री अजित पवार यांनाही सादर केला आहे. मात्र, या पुनर्विकासाला शिवसेना, आप तसेच मनसेने विरोध केला आहे. पुनर्विकास कामासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे करोनानंतर आता नाट्यक्षेत्राला उभारी मिळत असतानाच; पुन्हा “बालगंधर्व’ बंद ठेवल्यास अनेक कलाकार तसेच संबंधित कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे सांगत प्रस्तावास विरोध होत आहे.
मोहोळ म्हणाले, “बालगंधर्व रंगमंदिराचे काम सुरू असतानाच इतर 13 नाट्यगृहांना प्रतिसाद मिळावा, यासाठी तेथे चांगल्या सुविधा देऊन त्यानंतरच हे काम सुरू केले जाईल. तसेच येथील कार्यक्रमावर अवलंबून कलाकारांव्यतिरिक्त इतर सर्व घटकांना काम मिळेल. महापालिकेत आता प्रशासक नियुक्ती असल्याने या प्रस्तावास अंतिम मान्यता, प्रकल्पाचा खर्च तसेच प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल याबाबत पालिका प्रशासनच सर्व निर्णय घेणार आहे.’