औंध –पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरून औंध, बाणेर, बालेवाडी, सूस म्हाळुंगे गावांमधील सर्वपक्षीय इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नैसर्गिकरित्या बालेवाडीचा औंध गावाशी कोणत्याही पद्धतीने संबंध येत नसताना प्रभाग रचनेमध्ये बालेवाडी व औंध ही दोन गावे जोडण्यात आली आहेत. तसेच बाणेर, सूस, म्हाळुंगे या गावांमध्ये पुणे महानगरपालिकेतील एकमेव दोन नगरसेवकांचा प्रभाग करण्यात आला. ही रचना राजकारणातून की प्रशासकीय कारभाराच्या त्रुटीतून करण्यात आली आहे? असा प्रश्न निर्माण झाला असून या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी येथील आजी-माजींसह इच्छुक उमेदवारांनीही केली आहे.
बाणेर, सूस, म्हाळुंगे प्रभागाची रचना डिसेंबर महिन्यामध्ये “लीक’ झाल्यामुळे परिसरातील काही नागरिकांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली होती. तीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्याची स्थिती आहे. बाणेर, बालेवाडी ही गावे महानगरपालिकेमध्ये सामावेश झाल्यापासून या गावांचा डीपी देखील एकच आहे.
नैसर्गिकरित्या ही गावे एकमेकांलगत आहेत तसेच नव्याने समाविष्ट झालेले सूस व म्हाळुंगे ही गावे देखील बाणेर व बालेवाडी सीमेलगत आहेत, असे असताना प्रभाग रचना करताना “घोळ’ घालण्यात आला आहे. महापालिकेच्या नव्याने जाहीर झालेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 12 औंध, बालेवाडी व प्रभाग क्रमांक 13 हा बाणेर, सुस, म्हाळुंगे असा करण्यात आल्यामुळे औंध, बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे गावांमधील सर्वपक्षीय इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.
भारतीय जनता पक्षातील विद्यमान तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांचे राहाण्याचे ठिकाण आहे बालेवाडी ते औंध प्रभागांमध्ये आले आहे तसेच सर्वपक्षीय बहुसंख्य उमेदवारांचे रहाण्याचे ठिकाण आहे बालेवाडी ते औंध प्रभागांमध्ये आल्यामुळे बाणेर, सूस, म्हाळुंगे प्रभागासाठी प्रभागा बाहेरचेच बहुसंख्य उमेदवार निवडणूक लढवणार हे निश्चित आहे.
“त्या’ नगरसेवकांनी प्रभाग सुरक्षित करून घेतला?
या सर्व प्रभाग रचनेमध्ये बाणेर परिसरातील राज्यात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. मागील 2017 मध्ये हे ज्येष्ठ नगरसेवक अत्यंत कमी मतांच्या फरकाने निवडून आले होते, त्यामुळे या निवडणुकीतील धोका पाहून “त्या’ नगरसेवकांनी आपल्यासाठी सुरक्षित प्रभाग करून घेतला असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. या नवीन झालेल्या प्रभागा विषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.