शेवाळेवाडी भाजीमंडई बाहेर उद्या आंदोलन; शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
हडपसर – केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी धोरणांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्याकरिता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर उपोषण करणार आहेत. शेवाळेवाडी भाजीमंडई परिसरात गुरुवारी (दि.24) कॉंग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने लादलेल्या कृषी धोरणाला विरोध करण्याकरिता गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सिमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्याऐवजी केंद्र सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. या शेतकऱ्यांना पाठिंबा देणे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे बाळासाहेब शिवरकर यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी कायदे शेती आणि शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्यांची रचना करण्यात आली आहे. परंतु, भाजप सरकार ही यंत्रणाचा मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. बाजार समिती प्रशासनात काही त्रुटी असतील तर त्या दूर करता येतील. यातून शेतमालाला चांगला भावही देता येईल. मात्र, बाजार समित्या मोडीत काढू नयेत.
शेतकऱ्यांना एमएसपी देण्याची तोंडी ग्वाही भाजप सरकार देत आहे. पण, यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची तयारी नाही, ही बाब खटकणारी आहे. त्यामुळेच शेतकरी करीत असलेले आंदोलन रास्त आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच कॉंग्रेसतर्फे गुरुवारी भाजी मंडई बाहेरच उपोषण केले जात आहे. यावेळी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे, असे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले.