पुणे : परदेशातून 4 कोटी 93 लाख 25 हजार रूपयांचे 10 किलो सोन्याची तस्करी केल्या प्रकरणात भारतीय महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने अटक केलेल्या दोघांचा जामीन मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एस.घोरपडे यांनी फेटाळला. दोन्ही आरोपींनी हा गुन्हा केला नसल्याचा बचाव आरोपींच्या वकिलांनी घेतला. त्यानंतर विशेष सरकारी वकील संदीप घाटे यांनी जामिनास विरोध केला. या गुन्ह्यांत आणखी दोघांचा सहभाग असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.
तांत्रिक तपास करायचा आहे. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करणारा हा सोने तस्करीचा गुन्हा आहे. दोघांचा जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. घाटे यांनी केली. तसेच, यावेळी उच्च न्यायलयाच्या विविध न्यायनिवाड्यांचे दाखले देत भारत सरकारविरोधात केलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस जामीनावर मुक्तता करू नये, असे भूमिका घेतली. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला.
दिलिप दशरथ सोळंकी (वय 34) आणि बलवंतसिंग वाघेला ( वय 24, दोघे रा. चाणसामा, गुजरात) असे जामीन फेटाळलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपी मोटारीतून चेन्नईहून मुंबईच्या दिशेने जात असताना खेड शिवापूर टोल नाक्याजवळ कारवाई करण्यात आली होती.
रशिया येथून तस्करी करून माल आल्याची माहिती मिळाल्याने महसूल गुप्तवार्ता संचानालयाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर सरकारी पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला.