भाडे नाकारल्याचा जाब विचारल्याने तीघा साथीदारांसह केले वार
पुणे – भाडे नाकारल्याचा जाब विचारल्याने रिक्षा चालकाने तीघा साथीदारांसह दोघा प्रवाशांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये दोघेही प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवारी पहाटे सुमारास विश्रांतवाडी येथील टिंगरेनगरमध्ये घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात रिक्षा चालक आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित अनिल गिल(25,रा.विश्रांतवाडी) आणि सुशांत अनिल मोरे (38, रा.धानोरी) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी अमित गिल हे सहकारी सुशांत मोरेसह पहाटे दुचाकीवरुन घरी चालले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल धानोरी येथे संपले. यावेळी त्याने तेथे थांबलेल्या रिक्षा चालकाला घरी सोडण्याची विनंती केली.
रिक्षा चालकाने येण्यास नकार दिल्याने त्यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला. यानंतर रिक्षा चालकाने रिक्षातून खाली उतरुण रिक्षात बसलेल्या इतर तिघांना बोलावून घेतले. लय मस्ती आली आहे, याला सोडायचे नाही असे म्हणत सर्व त्याच्यावर धावून गेले.
यातील एकाने चाकू काढून आज याची विकेट टाकतो म्हणत फिर्यादी अमित याच्या पोटात चाकू खुपसला. यानंतर त्यांचा सहकारी सुशांत वाचवण्यासाठी मध्ये पडला असता, त्याच्याही पोटात आणि पाठीत चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते करत आहेत.