पुणे पालिकेत समावेशानंतर मूलभूत प्रश्न कायम तर काही भागात कामे लागली मार्गी
– संतोष कचरे
आंबेगाव बुद्रुक – पुणे महानगरपालिकेत शहरालगतची उर्वरित 11 गावे समावेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीही 2017 मध्ये पालिकेत गावांचा समावेश करण्यात आला. परंतु, गेल्या तीन वर्षांत आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, दत्तनगर, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसरातील रस्ते, वीज, पाणी, कचरा, वाहतूक असे मूलभूत प्रश्नही सुटलेले नाहीत.
यामुळे महानगरपालिकेने अगोदार समावेश केलेल्या गावांचा विकास करावा त्यानंतर उर्वरित गावे पालिकेत घ्यावी, अशी मागणी करीत आंबेगावच्या विकासबाबत महानगरपलिकेने गांभीर्याने उपययोजना राबविल्या नाहीत तर पालिकेच्या गाव समावेशाच्या प्रक्रिये विरोधात थेट न्यायालयात याचीका दाखल करण्यात येईल, असा इशाराही अविकसीत गावांतील नागरिकांसह गावकारभाऱ्यांनी दिला आहे. तर, प्रभाग क्र. 40 चा विकास मोठ्या प्रमाणात करण्यात आला असून नवीन समाविष्ट प्रभाग 42 मध्ये काही कामे प्रगतीपथावर असल्याचा तसेच आगामी काळात आंबेगावातील सर्वच प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे.
नाराजी केली व्यक्त….
गावाबाबत कोणताही विकासआराखडा आखण्यात आलेला नाही यातूनच खेळाच्या मैदानावर पाण्याची टाकी उभारण्यात आली. महापालिकेचा प्रशासकीय विभाग निष्क्रिय आहे. आमदार व खासदार यांचा निधीही वापरला जात नाही.
– अरुण राजवाडे, माजी सरपंच, आंबेगाव बुद्रुक
प्रभाग क्र. 40, 42 म्हणजे समस्यांचे माहेरघर झाले आहे. या भागाचा विकास करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. वाहतूक कोंडीची समस्या कायम असून डीपी रस्ते विकासाच्या प्रतीक्षेत आहे.
– संदीप बेलदरे, संस्थापक अध्यक्ष सन ब्राईट स्कूल
शनिनगरला ड्रेनेज लाइनची अवस्था बिकट आहे. या भागात कचरा डेपो सारखे प्रकल्प उभारून शेतकरी व नागरिकांचे कायमस्वरूपी नुकसान केले गेले आहे. लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रश्नी लक्ष देत नाहीत.
– संतोष ताठे, माजी सरपंच, आंबेगाव बुद्रुक
आंबेगाव बुद्रुकमध्ये कर आकारणी वगळता पालिका कोणताही उपक्रम राबवित नाही. निम्मे गाव अंधारात आहे. रस्ते, ड्रेनेज लाइन अशी कामे झालेली नाहीत. गुंठेवारी यासारख्या अनेक समस्या कायमच आहेत.
– अनिल कोंढरे , माजी उपसरपंच
विकासकामे केल्याचा दावा…
महानगरपालिकेत सत्ता नसतानाही निधी खेचून आणला, भागातील 85 टक्के रस्ते कॉंक्रिटीकरण केले. खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कात्रज सहापदरी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. तसेच, गेली 25 वर्ष प्रलंबित असलेला आंबेगाव वळण रस्ता सरळ केला. फालेनगर येथे बहुउद्देशीय केंद्र, आंबेगाव पठार येथे खेळाचे मैदान तसेच प्रभागातील सहकारी नगरसेवकांचे समन्वयाने आरोग्य केंद्र या सारखे प्रकल्प राबविले आहेत.
– युवराज बेलदरे, नगरसेवक, प्रभाग क्र.40
प्रभाग क्र.40 मध्ये 90 टक्के कामे पूर्ण केली आहेत. आतापर्यंत एकूण 13 प्रकल्प राबविले आहेत. बॅडमिंटन कोर्ट, स्पोर्ट लायब्ररी, भाजी मंडई, विरंगुळा केंद्र या सारखे लोकाभिमुख प्रकल्प उभारले आहेत. आंबेगाव बु. आरक्षित जागेत अद्यावत, अशी स्मशानभूमी, प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन गार्डन उभारली आहेत. दत्तनगर ते शनिनगर रस्त्यासाठी निधी मंजूर आहे.
– स्मिता कोंढरे, नगरसेविका
नव्याने समाविष्ट 11 गावांसाठी प्रभाग क्र.42 हा असून उपलब्ध निधीतून वर्षभरात आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द या भागात रस्ते, मोठ्या व्यासाच्या ट्रकलाइन, पाण्याच्या लाइन, पावसाळी लाइन आदी कामाला सुरवात केली आहे. महापालिकेकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करूण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
– अश्विनी पोकळे, नगरसेविका प्रभाग क्र. 42