पुणे-राज्यात आलेल्या धुळीच्या वादळाचा प्रभाव ओसरला असला तरी यामुळे गेल्या 48 तासांपासून पुणे आणि मुंबई शहरांतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील हवेची गुणवत्ता “अत्यंत वाईट’ स्तरावर असल्याची नोंद “आयआयटीएम -सफर’ या संस्थेने घेतली आहे.
सौदी अरब येथे निर्माण झालेले धुळीचे वादळ अरबी समुद्रामार्गे रविवारी (दि.24) राज्यात पोहोचले. या वादळाद्वारे मोठ्या प्रमाणात धुळ वाहून आल्याने गेली 24 तास पुणे, मुंबईसह उत्तर कोकणात ढगाळ वातावरणासह धुळीचे सावट होते. त्यामुळे दृष्यमानता कमी झाली होती.
प्रदूषकाचे प्रमाण 357 प्रतिघनमीटर…
आयआयटीएम-सफर संस्थेने घेतलेल्या नोंदीनुसार, पुण्यातील हवेतील पीएम 10 या प्रदूषकाचे प्रमाण 193 प्रतिघनमीटर इतके होते, तर पीएम2.5 या प्रदूषकाचे प्रमाण 111 प्रतिघनमीटर इतके नोंदविण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मानकानुसार हे प्रमाण अनुक्रमे 100 आणि 80 प्रतिघनमीटर असणे अपेक्षित आहे. यामध्ये भूमकर चौक आणि लोहगाव येथे हवेची गुणवत्ता “सर्वाधिक वाईट’ स्तरावर आहे. तर, पाषाण शिवाजीनगर, कात्रज आणि भोसरी या भागांमध्येही हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहचली आहे. वाढत्या पीएम प्रदूषकामुळे पुण्यातील हवेची गुणवत्ता सर्वाधिक प्रदूषित शहर मानल्या जाणाऱ्या दिल्ली येथील हवेच्या गुणवत्तेपेक्षाही अधिक वाईट स्तरावर आहे.