पुणे -खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, कीटकनाशके, शेती संबंधित असलेली दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असतो. पाऊस सुरू झाल्यानंतर कृषी सेवा केंद्रांवर खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होते.
त्यामुळे अशा परिस्थितीत दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवल्यास गर्दी होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर कृषी सेवा देणाऱ्या दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. तेथील मालक व कामगारांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. दोन व्यक्तींमध्ये 6 फुटांचे अंतर राखावे. दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ देऊन त्यानुसार नियोजन करावे. कृषीसेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना शक्यतो बांधावर खते, बियाणे आदी बाबींचा पुरवठा करण्याबाबत ई-कॉमर्सचा वापर करावा, असे सूचवण्यात आले आहे.