3.5 लाख रुपयांचा दंड केला वसूल : महामार्ग पोलिसांची कामगिरी
पुणे – सर्वात वेगवान समजल्या जाणाऱ्या पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील बेशिस्त वाहतूक दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. या बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत महामार्ग पोलिसांनी साडेआठ हजारांहूनही अधिक वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, विशेष म्हणजे अवघ्या सत्तर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत एक्सप्रेस वे वरील बेशिस्त वाहतुकीत वाढ होत आहे. या बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी मोहीम उघडली होती. मात्र, महामार्ग पोलिसांकडे कुमक कमी असल्याने ही कारवाई काही प्रमाणात थंडावली होती. त्यामुळे ही बेशिस्त वाहतूक पुन्हा फोफावली होती. ही बाब लक्षात घेऊन जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून ही मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मे महिन्याच्या अखेरीपर्यंत तब्बल साडेआठ हजारांहूनही अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या वाहनचालकांकडून साडेतील लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आगामी काळात या कारवाईची व्याप्ती आणखी वाढविण्यात येणार आहे. त्यामध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्गाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गाढवे यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.