पोलीस फौजफाट्यात 20 घरांवर चालवला जेसीबी
हतबल नागरिकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने तणाव
पुणे पालिकेच्या कारवाईची नगरविकास मंत्र्यांकडून दखल
संतप्त नागरिकांचा सत्ताधारी-प्रशासनावर रोष
पुणे –आंबिल ओढा सरळीकरणाच्या नावाखाली महापालिकेने गुरुवारी भल्या सकाळी स. नं. 133 येथे अतिक्रमण विरोधी कारवाई केली. अचानकपणे पोलीस फौजफाटा आल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी कारवाईस प्रखर विरोध करत निदर्शने केली. तर काहींनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
काही नागरिकांनी महापालिका न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने नागरिकांची बाजू ऐकत कारवाईस स्थगिती दिली. त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास ही कारवाई थांबवण्यात आली. तोपर्यंत जवळपास 20 घरांवर जेसीबी चालवण्यात आला होता. त्याच वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणी तातडीची बैठक घेत कारवाई स्थगितीचे आदेश पालिकेस दिले.
महापालिकेने 1987 च्या विकास आराखड्यानुसार, आंबिल ओढ्यातील अतिक्रमणे दूर करून हा ओढा सरळीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी स्थानिक नागरिक तसेच प्रशासनाची बैठक झाली. यावेळी नागरिकांना थोडा वेळ देण्याची मागणी नागरिकांनी केली. त्यानुसार येथील 134 घरांचे पुनर्वसन राजेंद्रनगर येथे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, या नागरिकांना “एसआर’च्या वतीने संबंधित बांधकाम व्यावसायिकाने नोटीस बजावल्या होत्या.
त्यामुळे नागरिक पुनर्वसनाच्या ठिकाणी गेल्यानंतर कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. दरम्यान, काही नागरिकांना कारवाईची कुणकुण लागली होती. येथील जवळपास 50 हून अधिक नागरिकांनी पुनर्वसनाच्या ठिकाणी आपले साहित्य नेले. त्यानंतर सकाळी 7 वाजता या भागात अचानक मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
तसेच लगेचच कारवाईस सुरूवात करण्यात आली. त्यावेळी या भागातील नागरिकांनी कारवाईस जोरदार विरोध करत आक्रोश केला. पोलीस बळासमोर हतबल झालेल्या नागरिकांनी साहित्य काढून घेत घरे मोकळी करण्यास सुरूवात केली. दुपारी दोनपर्यंत ही कारवाई सुरू होती.