पुणे: पूर्ववैमनस्यातून अपहरण करून दुहेरी हत्याकांड केल्याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सचिन रोहिदास चव्हाण याला तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. साक्षीदाराने आरोपीला ओळखले आहे. मात्र, ओळख परेड चुकीच्या पद्धतीने घेतली गेली आहे. तसेच, पोलीस तपासात गोळा केलेला पुरावा हा जामीन नाकारण्यासाठी पुरेसा नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती व्ही.जी.बिश्त यांनी हा आदेश दिला.
चव्हाण याच्यातर्फे ऍड. शुभांगी परुळेकर, ऍड. अजित पवार यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. सन 2018 मध्ये निगडी येथून दोघांचे अपहरण करून निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता. पोलिसांना अपहरणाच्या घटनानेनंतर 4 ते 5 दिवसांनी दोघांचे मृतदेह तळेगाव दाभाडे आणि निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडून आले होते.
हे खून पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे निगडी पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. तपासात पोलिसांनी आरोपी, अपहृत व्यक्तींना अपहरण करून घेऊन जात असताना बघितलेल्या साक्षीदारांचे जबाब घेतले होते.
त्या साक्षीदारांनी आरोपीला येरवडा जेलमध्ये झालेल्या ओळखपरेडमध्ये ओळखले होते. मात्र, बचाव पक्षातर्फे ऍड. शुभांगी परुळेकर आणि ऍड. अजित पवार यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा आदेश दिला.