आतापर्यंत केवळ 12 टक्केच वसुली
एकूण थकबाकी 1,743 कोटी रु.
प्रत्यक्ष वसुली 219.54 कोटी रु.
पुणे – थकीत मिळकतकर वसुलीसाठी पालिकेने राबवलेल्या अभय योजनेत आतापर्यंत केवळ 12 टक्के थकबाकीदारांनीच कर भरण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेतून महापालिकेस 1,743 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ 219.54 कोटींचाच महसूल आतापर्यंत मिळाला आहे. उर्वरित आठडाभरात जास्तीत जास्त कर वसुलीसाठी मिळकतधारकांना सूचना केल्या जात आहेत.
50 लाख रुपयांच्या आत थकबाकी असलेल्या करदात्यांना थकबाकीवर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत 80 टक्के सवलत देण्यात येत आहे. तर 50 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 50 ते 70 टक्क्यांपर्यंत टप्प्याटप्प्याने सवलत देण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत महापालिकेने सुमारे 4 लाख 88 हजार 732 नोटीस बजावल्या होत्या. त्यांची सुमारे 1,743 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर, या योजनेत आतापर्यंत सुमारे 82 हजार 153 मिळकतधारकांनी सुमारे 219.54 कोटी रुपये कर जमा केला आहे, असे प्रशासनाने सांगितले.
तब्बल 100 कोटींची सवलत!
अभय योजनेत सुमारे 99.53 कोटी रुपयांची दंड सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे, उत्पन्नाच्या सुमारे 48 टक्के सवलतच पालिकेने दिलेली असल्याने त्यावर टीका होत आहे. प्रत्यक्षात प्रामाणिक करदाते नियमित कर भरत असताना त्यांना पालिकेकडून नाममात्र सवलत देते. तर दुसरीकडे थकबाकीदारंना इतक्या मोठ्या प्रमाणात सवलत दिल्याने भविष्यात थकबाकीदार वाढतील, अशी भीती व्यक्त होत आहे.