पुणे – करोनाकाळात राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच देण्यात येणार आहे.
राज्यात 2015 पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी वर्गातील वातावरण उत्साही, आनंदी आणि क्रियाशील ठेवणारे असावे, वर्गात केवळ श्रवणावर भर न देता शैक्षणिक साहित्याद्वारे प्रत्यक्ष कृती आणि प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अभ्यासक्रमातील उद्दिष्टे साध्य करण्यात येतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ होत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत करोनामुळे शाळा बराच काळ बंद असल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेपासून वंचित राहून त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेशी एकरूप ठेवणे आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे आवश्यक असल्याने अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती साध्य करणे, अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट आणि दृढ होतील असे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालकांनी एप्रिलमध्ये सादर केला होता. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच उपलब्ध करून देण्यासाठी 184 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच उपलब्ध करून दिले जाणार प्राथमिक शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.