पाणी टंचाई : जिल्ह्यातील 36 गावांचाही समावेश
पुणे – पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील 342 वाड्यावस्त्यांवरील सव्वा लाख नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 36 गावांमधील 253 वाड्यावस्त्यांमधील 96 हजार 380 नागरिकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे.
राज्य सरकारने या नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत वितरित केला जाणार आहे. या निधीचा वापर प्राधान्याने टॅंकरने पाणीपुरवठा करणे, विहिरी अधिग्रहण करणे आणि नवीन विंधन विहिरी तयार करण्यासाठी वापरला जाणार आहे.
पाणीपुरवठा करताना खासगी टॅंकरसाठी जीपीएस प्रणालीची सक्तीची करण्यात आली असून, जीपीएस प्रणाली नसलेल्या खासगी टॅंकरला बिले देण्यात येऊ नयेत, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
आंबेगाव तालुक्यात टंचाई अधिक
जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, जुन्नर, खेड, पुरंदर, भोर आणि शिरूर या तालुक्यांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सर्वाधिक 12 गावे आंबेगाव तालुक्यातील असून, त्या खालोखाल खेडमधील 11 गावे आहेत. अन्य तालुक्यांपैकी जुन्नर आणि शिरूरमधील प्रत्येकी सहा, पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. भोरमधील पाच वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.