मार्केट यार्डातील स्थिती : शेतकऱ्यांना फटका बसणार?
ई-नाम आणि ई-लिलाव नियमांची 100 टक्के अंमलबजावणी
पुणे – केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार योजनेअंतर्गत पुण्याच्या बाजारपेठांमधील गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली गुळाच्या लिलावाची पद्धत अखेर बंद पडली आहे.
पुणे बाजार समितीच्या वतीने गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील भुसार बाजारात ई-नाम (ई-राष्ट्रीय कृषी बाजार) आणि ई-लिलावची 100 टक्के अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. ई-लिलाव पद्धतीमुळे प्रत्यक्ष मालाचा दर्जा कळत नसल्याने व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडे जाऊन माल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मार्केट यार्डामध्ये सुरू असलेले गुळाचे 30 ते 40 लिलाव देखील बंद पडले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत दि. पुणे जॅगरी मर्चट्स अससोसिएशनचे अध्यक्ष अजित सेठिया यांनी सांगितले की, “पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजर योजने अंतर्गत ई-नाम योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे लेखी पत्र सर्व आडते आणि व्यापाऱ्यांना दिले. याची अंमलबजावणी न करणाऱ्या आडत्यांवर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा देखील दिला आहे. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ई-नामच्या माध्यमातून गुळाचा लिलाव देखील ऑनलाइन पद्धतीने करण्याचे आदेश दिले आहेत. परतं ऑनलाईनवर गुळाचा दर्जा आणि इतर गोष्टी लक्षात येत नाही. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने गुळ खरेदी करण्यास व्यापारी तयार नाहीत. याशिवाय गुळाची गाडी आणि वाहतूकच भाडे देखील व्यापारी या ई-नाम पद्धतीमुळे रोख स्वरुपात देऊ शकत नाहीत. तसेच इतर अनेक अडचणी असल्याचे गुळाच्या व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या निदर्शनास आणून दिल्या. परंतु याबाबत कोणताही तोडगा काढला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी आता जागेवर थेट व्यापारी आणि आडत्यांना गुळाची विक्री सुरू केली आहे. यामुळे स्पर्धा कमी झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.’