परीक्षा विभागाची डोकेदुखी वाढणार
पुणे – पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची परीक्षा “50:20′ या नव्या पॅटर्ननुसार ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यातील 20 गुणांची परीक्षा ऑनलाइनद्वारे लेखी पद्धतीने होणार आहे. ही नवी पद्धतच विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली. आता करोनाचे संकट कमी होत असतानाही विद्यापीठाच्या सर्व परीक्षा केवळ ऑनलाइनद्वारे घेण्याच्या निर्णयावर मत-मतांतरे होत आहेत. ही सर्व परिस्थिती असताना विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा गुणवत्तापूर्ण होण्याच्या दृष्टीने नवा पॅटर्न राबविला आहे. ही पद्धत आता विद्यार्थ्यांना आणि परीक्षा विभागास डोकेदुखी वाढविणारी असल्याचे दिसत आहे.
नव्या पॅटर्नमधील 20 गुणांची परीक्षा ही वर्णनात्मक तसेच लेखी स्वरुपात होणार आहे. परंतु, ती ऑनलाइन होणार आहे. यात 5 गुणांचे चार प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने टाइप करावे लागणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना कागदावर लिहून ते अपलोड करण्याचा पर्याय आहे. संगणक, मोबाइल यासह अन्य माध्यमातून परीक्षा देणाऱ्यांना त्यावरून शब्द टाइप करून असे विविध पर्यायांवर विचार होत आहे. मुळात ही पद्धत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने संयुक्तिक ठरणार नसल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
परीक्षा कशा होणार याकडे लक्ष
20 गुणांची परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची, त्याचे स्वरुप कसे निश्चित करायचे, या तांत्रिक बाबींसाठी विद्यापीठातील प्रा. संजीवन सोनवणे, मनोहर चासकर, पराग काळकर आणि अंजली कुरणे या चार अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली. या समितीची पहिली बैठक शुक्रवारी (दि.12) होत आहे. त्यामुळे नव्या पद्धतीनुसार परीक्षा कशा पद्धतीने देता येणार आहे, या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.