पर्यावरण संवर्धनात सायकल योजनेचा खारीचा वाटा
सायकल आणि ई-वाहनांचा वापर वाढण्याची गरज
पुणे – शहराचे पर्यावरण संवर्धन तसेच सायकलींचे शहर म्हणून असलेली पुण्याची ओळख टिकविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पब्लिक बायसिकल शेअरिंग योजनेने पर्यावरण संवर्धनात खारीचा का होईना, पण वाटा उचलला आहे. याबाबत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात पुणेकरांनी सायकल्सचा अधिकाधिक वापर करणे सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे.
शहरात सध्या असलेल्या 2,500 सायकलींमुळे दररोज सुमारे 1,200 किलो कार्बन उत्सर्जन घटले आहे. गेल्या वर्षभरात या योजनेमुळे शहरात सुमारे 42 ते 50 टन कार्बन उत्सर्जन घटला असल्याचा दावा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केला आहे. शहरात असलेल्या सुमारे 37 लाख वाहनांमुळे वर्षाला तब्बल 46 लाख टन कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन होते. या तुलनेत हा आकडा अवघा 1 टक्का असला, तरी भविष्यात सायकलींचे तसेच ई-वाहनांचे प्रमाण वाढल्यास हा आकडा लक्षणीय वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डिझेल आणि पेट्रोलच्या ज्वलनातून शहरात निर्माण होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी, नागरिकांना या वायूमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागत असून शहराचे वायु प्रदूषणही धोकादायक पातळीवर गेले आहे. ही बाब लक्षात महापालिकेने पर्यावरण संवर्धनासाठी पावले उचलण्यास सुरू केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने मागील वर्षी शहरात पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना सुरू केली.
सुरूवातील काही महिने या योजनेत सुमारे 8 हजार सायकली पुणेकरांसाठी उपलब्ध होत्या. त्यानंतर आता युलु नावाच्या कंपनीच्या सुमारे अडीच हजार सायकल शहरात आहेत. या सायकलींच्या शहरात दरदिवशी सुमारे 12 ते 15 हजार किलोमीटर वापरल्या जातात. त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्याची माहिती या कंपनीने पर्यावरण विभागास दिली आहे.
महापालिका देणार ई-वाहनांना प्राधान्य
शहराच्या पर्यावरणासाठी महापालिकेकडून आता भविष्यात ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून या पूर्वी शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी सीएनजी कीट बसविणाऱ्या रिक्षांना अनुदान देण्यात येत होते. मात्र, आता शहरातील जवळपास सर्वच रिक्षांना अशी कीट बसल्याने आता प्रशासनाने भविष्यात शहरात ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देणे शक्य आहे का, याची चाचपणी सुरू केली आहे.
सायकल योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाच्या वापराचे उद्दिष्ट वेगवेगळे असल्याने कामावर जाण्यासाठी सायकल वापरण्यात येत असल्याचे प्रमाण तुलनेने अद्याप कमीच आहे. मात्र, तरीही दिवसाला किमान 1,200 किलो कार्बन उत्सर्जन या मुळे कमी होत असल्याने हा पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा वाटा आहे. भविष्यात सायकलींची वाढलेली संख्या पर्यावरण संवर्धनासाठी मोलाची भूमिका बजावू शकेल.
– मंगेश दीघे, पर्यावरण अधिकारी, मनपा.