पुणे – राज्यात सर्वत्र पुन्हा तापमानाचा पारा वाढू लागला आहे. विविध भागांत बुधवारी पारा चाळीस अंशाच्या पुढे गेला होता. पुण्यातही कमाल तापमान 40.3 अंश सेल्सियस नोंदविले गेले.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा सूर्य आग ओकू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा सरासरीपेक्षा तीन ते चार अंशाने जास्त आहे. उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे 42.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगलीमध्ये सुद्धा तापमान चाळीस अंशांपर्यंत पोहोचले आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी तापमान 42 अंशांच्या पुढे पोहोचले आहे. विदर्भात सुद्धा अशीच परिस्थिती आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात सर्वत्र हवामान कोरडे असल्याने तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. विदर्भात तर येत्या दोन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात बुधवारी सर्वांतजास्त तापमान ब्रह्मपुरी येथे 45.1 अंश सेल्सियस नोंदविले गेले. पुण्यात सुद्धा गेल्या दोन दिवसांपासून तापमान वाढत आहे. येत्या 48 तासांत शहरातील तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे.