पुणे – “सेरेब्रल पाल्सी’ आजाराने त्रस्त मुला-मुलींसाठी रत्नागिरी आणि सातारा येथे आयोजित तपासणी आणि मूल्यांकन अभियानांतर्गत 266 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी येथील 79 मुले आणि सातारामध्ये 188 मुलांची तपासणी करण्यात आली. तर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया आणि ऑर्थोटीकसाठी सल्ला दिला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या विद्यमाने या दोन दिवसीय अभियानाचे राबविण्यात आले असून, आतापर्यंत 986 मुलांवर उपचार केल्याचा आनंद असल्याची भावना फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांनी व्यक्त केली.
यावेळी रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेचे अधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. आठल्ये, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. ठोमरे , सिव्हिल सर्जन डॉ. भोळंदे, जिल्हा परिषद एज्युकेशन डिपार्टमेंटचे गव्हाणे उपस्थित होते. सातारा जिल्हा परिषदेचे अधिकारी डॉ. कैलाश शिंदे, डिस्ट्रिक्ट हेअल्थ ऑफिसर डॉ. भगवान पवार यांच्या सहकार्याने पार पडला. सेरेब्रल पाल्सी मेंदूतील काही भागांना हानी पोचल्याने उद्भवतो. त्यामुळे हालचाली, मानसिक तोल आणि इतर अवयव मंदावतात. लहानपणी हा आजार होतो आणि व्यक्तिपरत्वे त्यात बदल होतात. जगात त्याचे प्रमाण 1 हजार मागे 2, तर भारतात एक हजार मागे 3 असे आहे. परंतु, या आजाराने ग्रस्त मुलांची ज्ञानक्षमता सर्वसाधारण असते. त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
यावेळी सातारा, वाई आणि पाचगणी या केंद्रांवर संचेती हॉस्पिटल, भारती हॉस्पिटलच्या सहकार्याने समुदेशन, फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर पाटण केंद्रावर कृष्णा हॉस्पिटल कराड यांच्या मदतीने आठवड्याला फिजिओथेरपीची सोय करण्यात आलेली आहे. अलीकडेच संस्थेने योग्य आहार आणि खाण्याच्या सवयी यासाठी आहारतज्ज्ञ जोडून घेतले आहे. या केंद्रांवर 20-25 मुले नियमित फिजिओथेरपी घेत आहेत. आजवर 49 शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत.