पुणे – गेल्या दोन महिन्यांत (मार्च आणि एप्रिल) करोनाने 129 तरुणांचा बळी घेतला असून, हे सर्व 20 ते 40 या गटातील आहेत. सर्वाधिक मृत्यू 60 वर्षांवरील बाधितांचे आहेत. तर, दोन महिन्यांत 2 हजार 44 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
फेब्रुवारीपासून करोनाने पुन्हा थैमान घातले असून, यामध्ये तरुणांना बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागच्या वर्षी तरुण बाधितांची संख्या कमी होती. तसेच. बाधित तरुणांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी होते. त्यातही एखाद्या दुसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याला आधी कोणतीतरी गंभीर व्याधीने ग्रासलेले असायचे आणि त्यातून प्रतिकारशक्ती नसल्याने मृत्यू व्हायचा.
परंतु, फेब्रुवारीपासून करोनाची दुसरी लाट आली. त्यामध्ये वयाचे सगळे निष्कर्ष गळून पडले आहेत. यावेळी तरुणांना तर बाधा होत आहेच परंतु फुफ्फुसे वेगाने निकामी होऊन जीव जाण्याचे प्रकारही होत आहेत.
बाधा झाल्यानंतर लगेचच उपचार सुरू केले नाहीत, उपचारांना पाच – सहा दिवस उशीर झाला तर फुफ्फुसातील संसर्ग वेगाने वाढत जाऊन ऑक्सिजनची पातळी खालावून त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्याचे वेळ आली आहे.
या एक दोन महिन्यांत बाधा होऊन मृत्युमुखी पडलेले 129 तरुण असून, त्यामध्ये 95 युवक आणि 34 युवतींचा समावेश आहे. 40 ते 60 या वयोगटातील 241 जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचेही प्रमाण मागील लाटेपेक्षा जास्त असल्याचे दोन महिन्यांच्या मृतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यामध्येही पुरुष मृतांची संख्या जास्त असून, ती 395 असून महिलांची संख्या 241 आहे. दोन महिन्यांत 1 हजार 277 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये 791 पुरुष आणि 486 ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे.